


खानापूर : मलप्रभा नदीतील पाणी विविध योजनांद्वारे अन्यत्र वळविण्याच्या हालचालींमुळे खानापूर तालुक्याच्या पाणीहक्कावर गदा येण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप खानापूर तालुका काँग्रेसचे नेते सुरेशभाऊ जाधव यांनी केला आहे. हा विषय कोणत्याही पक्षाचा नसून खानापूरच्या अस्तित्वाचा, शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आणि पुढील पिढ्यांच्या पाणीसुरक्षेचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलप्रभा नदीवरून पारिश्वाड (Siddanbhavi TFS) योजनेअंतर्गत 28.40 MCFT आणि कुसमळी (जांबोटी) – Santobastwad TFS योजनेअंतर्गत 30 MCFT पाणी उपसा करण्याची कामे सुरू आहेत. याशिवाय कळसा डायव्हर्जन योजना (1.72 TMC) आणि भांडुरा नाला डायव्हर्जन योजना (2.18 TMC) यांचाही भविष्यात खानापूरवर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते, तर शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत हक्काचे नदीचे पाणी अन्यत्र वळविले जात असताना तालुक्याचे आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मौन का बाळगत आहेत, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
पंपिंग स्टेशन, पाइपलाइन आणि अन्य यंत्रणा उभारल्यानंतर भविष्यात पाण्याचा उपसा केवळ पावसाळ्यातच होईल, याची हमी कोण देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच खानापूरच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षण कोण करणार, तालुक्याच्या भविष्यासाठी कोण उभे राहणार आणि स्थानिक नेतृत्वाची भूमिका नेमकी काय, याचे स्पष्ट उत्तर जनतेला मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
याचबरोबर, या गंभीर विषयावर भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच सीमाप्रश्नावर आंदोलने करणारे म. ए. समिती नेतेही मौन बाळगून असल्याची टीका करत, पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन सुरेशभाऊ जाधव यांनी केले.
दरम्यान, या विषयावर संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

Belgaum Varta Belgaum Varta