खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजता माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये २४ मार्च २०२२ रोजी एकी संदर्भात झालेल्या सर्व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली. याचवेळी खानापूर तालुक्यात म. ए. समितीचे दोन गट २०१८ पासून कार्यरत होते. ते दोन्ही गट हब्बनहट्टी येथे झालेल्या चर्चेप्रमाणे दोन्ही गटातील अध्यक्ष, कार्याध्यक्ष, चिटणीस, खजिनदार व दोन्ही गटातील कार्यकारिणी सदस्यांनी आपली पदे विसर्जित केल्याचे घोषित करून बिनशर्त एकी झाल्याची घोषणा म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते माजी सभापती मारुतीराव परमेकर, माजी आमदार दिगंबरराव पाटील, देवाप्पा गुरव यांनी जाहीर केले आणि याला अनुमोदन आबासाहेब दळवी यांनी देऊन एकीवर शिक्कमोर्तब केले. परंतू ४ एप्रिल २०२२च्या बैठकीला पुन्हा काही सदस्यांनी काही अटी पुढे करून एकीला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतू त्या बैठकीमध्ये दोन्ही गटातील आठ-आठ लोकांची कमिटी करून एकीची प्रक्रिया पुर्णत्वास न्यावी असा ठराव करण्यात आला. त्या अनुषंगाने १ मे २०२२ रोजी संबंधितांची बैठक होऊन पत्रकार परिषदेद्वारे खानापूर तालुक्यात म. ए. समितीची पुनर्बांधणी करण्यासाठी जनजागृतीचा शुभारंभ कुप्पटगिरी येथून करण्याचे ठरले. परंतू संबंधित जागृती बैठकीला देवाप्पा गुरव यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. तदनंतर ११ मे २०२२ रोजी सदर गटाने माजी केंद्रीय मंत्री, सीमाभागाचे पितामह शरद पवारांना भेटताना वेगळेपण दाखवून भेट घेतली आणि ५ जून २०२२ रोजी आपल्या गटाचा नवीन अध्यक्ष निवडला व एकीच्या प्रक्रियेला खीळ घातली. राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला स्वतःची मान अडकवून घेतलेल्या समितिद्रोहीच्या इच्छेप्रमाणे एकीच्या निर्मळ भावनेला तडा देणाऱ्यांच्या काही मोजक्या लोकांच्या वाईट प्रवृत्तीचा तीव्र निषेध या बैठकीत करण्यात आला. तसेच अशा लोकांना समितीच्या जनसंपर्क दौऱ्यातून जनतेसमोर उघडे पाडण्याचे ठरविण्यात आले. यासाठी माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतत्वाखाली लवकरच खानापूर तालुक्यातील सर्व समितीप्रेमींची व्यापक बैठक येणाऱ्या पंधरवड्यात घेण्याचे ठरविण्यात आले तसेच मध्यवर्तीच्या म. ए. समितीच्या जबाबदार नेत्यांना लवकरच एक शिष्टमंडळ भेटून खानापूर तालुक्यातील समितीच्या सर्व जटील प्रश्नांबद्दल चर्चा करणार असून त्यानंतर पुढील भूमिका घेण्याचे ठरले आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबरराव पाटील म्हणाले की, माजी आमदार म्हणून आपण यापुढेही एकीसाठी प्रयत्नशील असणार आहे. आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत म.ए.समितीशी एकनिष्ठ असेन.
यावेळी यशवंतराव बिर्जे यांनी प्रास्ताविक केले आणि आबासाहेब दळवी, विशाल पाटील, शामराव पाटील, विठ्ठल गुरव, मऱ्याप्पा पाटील, डी. एम. गुरव, अविनाश पाटील, अनिल पाटील, मुरलीधर पाटील, डॉ. एल. एच. पाटील, नारायण कापोलकर, रुक्माणा झुंझवाडकर, कृष्णा मनोळकर, अमृत पाटील, कृष्णा कुंभार इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले.