Saturday , June 13 2026
Breaking News

जागतिक बालमजुरी विरोधी दिन विशेष : बालपणाच्या हातात पुस्तके द्या, मजुरीची ओझी नाही!

Spread the love

 

“मूल म्हणजे मातीचा गोळा… आकार द्यावा तशी मूर्ती घडते.”
बालपण हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर उभे राहते ते निरागस हास्य, स्वप्नांनी भरलेले डोळे आणि आनंदाने बागडणारे कोवळे आयुष्य. पण समाजातील प्रत्येक मुलाच्या वाट्याला असे सुंदर बालपण येतेच असे नाही. अनेकांचे बालपण गरिबी, उपासमार आणि मजुरीच्या ओझ्याखाली चिरडले जाते. म्हणूनच १२ जून हा दिवस जगभर “जागतिक बालमजुरी विरोधी दिन” म्हणून पाळला जातो.

मुले ही देवाघरची फुले, राष्ट्राची अमूल्य संपत्ती आणि उद्याच्या भारताची शिल्पकार आहेत. त्यांच्या हातात पुस्तके, रंगीत स्वप्ने आणि खेळणी असायला हवीत; मात्र वास्तवात अनेक मुलांच्या हातात आजही विटा, फावडे, चहाचे ट्रे, भाजीच्या टोपल्या आणि कारखान्यातील अवजारे दिसतात. हे चित्र केवळ वेदनादायी नाही, तर समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.

भारतातील बालमजुरी (प्रतिबंध व नियमन) कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुलांकडून कोणतेही काम करून घेणे हा गुन्हा आहे. तसेच १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये कामावर ठेवणेही शिक्षेस पात्र आहे. कायदे आहेत, नियम आहेत; मात्र आजही हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहून मजुरीच्या चक्रात अडकलेली दिसतात.

बालमजुरीच्या समस्येची मुळे खोलवर रुजलेली आहेत. दारिद्र्य, बेरोजगारी, अशिक्षित पालक, स्थलांतर, कौटुंबिक कलह, सामाजिक उदासीनता आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. पण या सर्व कारणांच्या केंद्रस्थानी एकच कटू वास्तव उभे राहते—गरिबी.

घरातील भांडणांना कंटाळून, उपासमारीपासून बचाव करण्यासाठी किंवा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अनेक मुले शिक्षणाचा मार्ग सोडून कामाच्या शोधात निघतात. हळूहळू त्यांचे बालपण हरवते आणि त्यांच्या स्वप्नांवर जगण्याची धूळ साचते.

आजही चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स, कारखाने, दुकाने, बांधकामे, शेतमळे, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर वस्तू विकणाऱ्या लहान मुलांच्या रूपाने बालमजुरीचे विदारक वास्तव आपल्याला पाहायला मिळते. ज्या वयात मुलांच्या हातात पाटी-पुस्तक असायला हवे, त्या वयात त्यांना उदरनिर्वाहासाठी कष्ट करावे लागत आहेत. यापेक्षा मोठी सामाजिक शोकांतिका कोणती?

बालमजुरी ही केवळ आर्थिक समस्या नाही; ती मुलांचे बालपण, शिक्षण, आरोग्य, आत्मसन्मान आणि उज्ज्वल भविष्य हिरावून घेणारी सामाजिक कीड आहे. एका मुलाला शिक्षणापासून दूर ठेवणे म्हणजे एका पिढीची प्रगती रोखणे होय.

जागतिक बालमजुरी विरोधी दिन हा केवळ दिनविशेष नसून आत्मपरीक्षणाची संधी आहे. आपल्या परिसरात कुठेही बालकामगार आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देणे, अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजात जनजागृती करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

बालपण विकत मिळत नाही, ते जपावे लागते.
मुलांच्या हातातील कामाची साधने काढून त्यांना शिक्षणाची ताकद देणे, त्यांचे हरवलेले बालपण परत मिळवून देणे आणि त्यांच्या स्वप्नांना नवे आकाश देणे हीच या दिवसाची खरी प्रेरणा आहे.

कारण प्रत्येक मुलाला मजुरी नव्हे, तर शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा जन्मसिद्ध हक्क आहे.

– राधिका सांबरेकर (पत्रकार)

About Belgaum Varta

Check Also

महिला दिन विशेष : “मातृत्वाची दुहेरी किमया : जुळ्या मुलांच्या आईंची संघर्ष आणि आनंदाची कहाणी”

Spread the love  महिला म्हणजे सृजनाची शक्ती. तिच्या उदरातूनच नवीन जीवनाचा जन्म होतो आणि कुटुंबाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *