पावसाळापूर्व कामावर प्रश्नचिन्ह; दररोज तीन तासापेक्षा अधिक वेळ वीज गायब
निपाणी (वार्ता) : हेस्कॉमच्या कारभाराचा फटका एप्रिल मे महिन्यात शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना बसला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सूनपूर्व थोडा पाऊस झाला. मात्र त्यानंतर तापमान अधिक वाढत असून उकाडादेखील वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. रात्री दहानंतर अनेक भागात विजेचा लपंडाव पुन्हा सुरू झाला आहे. त्यात अधूनमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे देखील वीजपुरवठा खंडित होत असल्याने हेस्कॉमच्या मॉन्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
जून महिन्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेला असून आर्द्रता देखील वाढली आहे. त्यामुळे उकाडा दमटपणा आणि उष्णता जाणत आहे. रात्री देखील आर्द्रता व दमटपणा जाणवत असल्यानेघरांमध्ये एसी, कुलर तसेच फॅनचा वापर वाढला आहे. त्यात रात्री ऐन झोपेच्या वेळी वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. निपाणीतील उपकेंद्रावर वीजभारवाढल्याने वीजपुरवठा करण्याची समस्या निर्माण झाली आहे.. रात्रीच्या वेळी उपकेंद्रावर वीजभार अचानक वाढत असल्याने ब्रेक डाऊन, ट्रान्स्फॉर्मरवर विघाड, डीपीवरील फेज जाणे, वीजतारा तुटणे, जंम्पर तुटणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरातील वीजपुरवठ्याचा ताळमेळ साधण्यासाठी ग्रामीण भागात रोज तीन ते चार तास रात्री वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
——————————————————————–
‘उन्हाचा पारा तसेच उकाडा वाढल्याने प्रत्येक घरातील विजेचा वापर तांत्रिक बिघाड होत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.’
Belgaum Varta Belgaum Varta