
एकेकाळी सकाळची सुरुवात घड्याळाच्या अलार्मने नव्हे, तर पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने व्हायची. अंगणात चिमण्या दाणे टिपत असायच्या, झाडांच्या फांद्यांवर पक्ष्यांची लगबग असायची आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करून जायची. निसर्ग हा घराचा एक सदस्यच वाटायचा.
मात्र आज चित्र बदलले आहे. काँक्रीटच्या उंच इमारती, वाढते प्रदूषण, मोबाईल-टीव्हीच्या आभासी जगात हरवलेले आयुष्य आणि वेगवान विकासाच्या शर्यतीत आपण नकळत निसर्गालाच मागे टाकले आहे. परिणामी चिमण्यांची चिवचिव कमी झाली, झाडांची सावली विरळ झाली आणि निसर्गाशी असलेले आपले भावनिक नातेही कमकुवत होत गेले.
आज, ५ जून जागतिक पर्यावरण दिन
हा दिवस केवळ पर्यावरणाबद्दल बोलण्याचा नाही, तर स्वतःकडे पाहण्याचा, आपल्या कृतींचा हिशोब मांडण्याचा आणि भविष्यासाठी नवी दिशा ठरवण्याचा दिवस आहे.
आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया…
* आपण आपल्या मुलांसाठी नेमके काय जतन करत आहोत?
* फक्त आधुनिक घरे, महागडी साधने आणि सुखसोयी की स्वच्छ हवा, निर्मळ पाणी, हिरवीगार झाडे आणि जगण्यालायक पृथ्वी?
* कारण आपल्या पुढच्या पिढीला केवळ संपत्ती नव्हे, तर सुरक्षित पर्यावरणाचीही गरज आहे.
यंदाची संकल्पना… भविष्याला दिशा देणारी
“निसर्गाकडून प्रेरित… हवामानासाठी… आपल्या भविष्यासाठी.”
जागतिक पर्यावरण दिन २०२६ ची ही संकल्पना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते — निसर्ग हा समस्येचा भाग नसून समाधानाचा मार्ग आहे. हवामान बदल, वाढते तापमान, पाण्याचे संकट आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना करण्यासाठी निसर्गाशी सुसंवाद हाच एकमेव पर्याय आहे.
पर्यावरण संवर्धनाची पहिली शाळा म्हणजे कुटुंब
पर्यावरणाचे धडे मोठ्या व्यासपीठावर नाही, तर घराच्या चार भिंतींमध्ये सुरू होतात.
आई मुलांना अन्न वाया घालवू नये हे शिकवते.
वडील अनावश्यक दिवे आणि उपकरणे बंद करून ऊर्जाबचतीचा संदेश देतात.
आजी घरातील ओला कचरा खतासाठी वापरते.
आजोबा रोपांची काळजी घेतात, झाडांना पाणी घालतात.
हीच छोटी-छोटी कृती मुलांच्या मनावर संस्कार घडवत असते. पर्यावरण जपण्याची सवय पुस्तकांतून नव्हे, तर घरातील कृतीतून रुजते.
स्वयंपाकघरातून सुरू होणारी हरित क्रांती
घरातील स्वयंपाकघर हे पर्यावरण संवर्धनाचे सर्वात प्रभावी केंद्र ठरू शकते.
अन्न वाया न घालवणे, उरलेले पाणी झाडांना देणे, स्थानिक आणि हंगामी भाजीपाल्याचा वापर करणे, कापडी पिशव्या वापरणे, सिंगल-यूज प्लास्टिक टाळणे, पावसाचे पाणी साठवणे, घरगुती खत तयार करणे आणि विजेची बचत करणे — या साध्या वाटणाऱ्या सवयी भविष्यात मोठा बदल घडवू शकतात.
पर्यावरण म्हणजेच आपला विस्तारित परिवार
माती, पाणी, हवा, झाडे, नद्या, डोंगर, जंगल आणि त्यातील प्रत्येक जीव – हे सर्व आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. पर्यावरण ही बाहेरची गोष्ट नाही; ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
ज्या दिवशी आपण निसर्गाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानू, त्या दिवशी त्याचे संरक्षण ही जबाबदारी नव्हे तर आपुलकी बनेल.
आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक संकल्प करूया…
एक झाड लावण्याचा नाही, तर ते जगवण्याचा.
पाणी वापरण्याचा नाही, तर ते वाचवण्याचा.
पर्यावरणाबद्दल बोलण्याचा नाही, तर ते कृतीतून जपण्याचा.
कारण…
पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती नाही; ती आपल्या पुढच्या पिढीकडून घेतलेली उधारी आहे.
चला, निसर्गाशी पुन्हा मैत्री करूया…
चला, चिमण्यांच्या किलबिलाटाने भरलेले उद्याचे जग घडवूया…
“ओ री चिरैया… पुन्हा एकदा आपल्या अंगणात परत येण्यासाठी…”
– राधिका सांबरेकर, बेळगाव
Belgaum Varta Belgaum Varta