मुंबई : महाविकास आघाडीने अडिच वर्षे चांगले कारभार केला आहे. सध्याची वस्तूस्थिती नाकारता येत नाही. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले नेते इथे आल्यानंतर वस्तूस्थिती मांडतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. आमदार महाराष्ट्रात आल्यानंतर समजेल की महाविकास आघाडी सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती महाराष्ट्रात अनेक वेळा बघितली. हे सरकार टिकून राहिल, असे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे. बंडखोरांना महाराष्ट्रात यावे लागेल असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी स्थानिक स्थिती पाहून एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नाही असे म्हटले असेल पण वस्तूस्थिती तशी नाही. अजित पवारांना गुवाहाटीच्या स्थितीबद्दल माहिती नसेल, असेही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आमदार समवेत असलेला व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रीय पक्षाची ताकद आमच्यासोबत आहे, असे म्हटले होते. यावर शरद पवार यांनी राष्ट्रीय पक्षांची यादी वाचून दाखवत एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपची ताकद असल्याचे म्हटले आहे.