मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यामध्ये शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती आहे. मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल पण भाजपसोबत युती करावी असं त्यांनी म्हटलं आहे.
यावर मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर चर्चा करू, तुम्ही पहिला मुंबईत या असा संदेश दिला असल्याची माहिती आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीसोबत कोणताही ताळमेळ नाही, आमदार आणि मंत्र्यांचीही तीच भूमिका आहे. पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, त्यामुळे भाजपसोबत युती करणं हिच काळाची गरज आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपण असं काय केलं की ठाण्यामध्ये आपल्या विरोधात नाराजी पसरवली जातेय असंही भावूक होऊन त्यांनी विचारलं असल्याची माहिती आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत या, चर्चा करु असा संदेश दिला आहे.
दरम्यान, आपण कोणत्याही पक्षासोबत चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचीही तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शिवसेनेला काँग्रेसची सोबत परवडणार नसल्याचं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ खडसे हे सुरतमध्ये असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यांनी शिवसेनेविरोधात उघड बंड पुकारलं असून त्यांची मनधरणी करायला शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र फाटक सुरतला गेले होते.