नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते आमदार महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. ती काही केल्या थांबायला तयार नाहीत. बरं त्याबद्दल त्यांनी आणखी माफीही मागितली नाही. दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावादाचा प्रश्न तापलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री धमकीची भाषा करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साधे आक्रमकपणाने बोलतही नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातली काही गावे दुसऱ्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त करतात त्यावरही मुख्यमंत्री ठोसपणे काही भूमिका घेत नाहीयेत. तसेच राज्यातले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असताना मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार डोळे उघडे ठेऊन बघत बसलेत. त्यामुळे लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली आहे. लाखो युवकांच्या हातून रोजगार गेलाय. विदर्भाच्या अनुशेषाचा प्रश्न कायम आहे, अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये, असे अनेक प्रश्न असताना राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाला जाणे आमच्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष एकमताने चहापानावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच सरकारने आयोजित केलेला अधिवेशन कालावधी वाढवून किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन घ्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
दोन वर्षांच्या खंडानंतर सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपराजधानी नागपूर येथे सुरुवात होत आहे. यंदाही विविध मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची रणनीती विरोधी पक्षाने आखली आहे. विरोधकांनी ताणून धरल्यास कामकाजाऐवजी अधिवेशनात गोंधळच जास्त होऊ शकतो. विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये राज्यपाल कोश्यारी यांना लक्ष्य केले जाईल. तसेच त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी गोंधळ घातला जाईल. दुसरीकडे सीमावाद प्रश्नावरुन विरोधी पक्ष अतिशय आक्रमक भूमिका घेऊन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.
नाकाखालून सरकार घेऊन गेलो म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांनी सुनावलं
देवेंद्र फडणवीस यांनी काल नाकाखालून सरकार नेल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, नाकाचा उल्लेख त्यांनी करावा हे दुर्दैव आहे. प्रत्येकाची नाकं तपासावी लागतील. मात्र त्याच्या खोलात मला जायचं नाही. हे लोक एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या भूमिकेवेळी त्यांचा तो अंतर्गत निर्णय आहे, आमचा त्यांच्याशी संबंध नाही, असं सांगायचे. नंतर मी बदला घेतला म्हणायला लागले, फोन करुन पाठवलं असंही सांगितलं. आघाडी सरकार आल्यापासून त्यांना वेदना होत होत्या. पहिल्या दिवसापासून सरकार घालविण्यासाठी ते कामाला लागले होते. नाकाखालून सरकार नेलं की आणखी कशा खालून सरकार नेलं हा संशोधनाचा विषय आहे, अशा आक्रमक शब्दात त्यांनी फडणवीसांना फटकारलं.