दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे आश्वासन ; खा.धैर्यशील माने यांची माहिती
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे सीमाभागात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, त्यामुळे त्यांना समज देण्याची विनंती पंतप्रधानांकडे केली. यावेळी पंतप्रधानांनी लवरकच दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करू, असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून समन्यवयातून तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. परंतु, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन होतांना दिसून येत नाही. अशात सीमाभागातील मराठी बांधव दडपणाखाली आहेत. कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होवू शकतो, असे माने यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनात आणून देत बोम्मई यांना कडक शब्दात समज द्यावी,अशी विनंती केली. ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मी देखील आता त्यांच्यासोबत चर्चा करेल’, असे आश्वासन भेटीदरम्यान पंतप्रधानांनी यावेळी दिले.