मालवण : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या चबुतऱ्याच्या बाजूची काही माती खचली आहे. सततच्या पावसामुळे नव्याने करण्यात आलेल्या जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडली आहे. यामुळे मूर्तीस कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली आहे.
नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पुढील १०० वर्ष टिकेल इतका मजबूत उभारण्यात आला आहे. या मूर्तीचा चबुतरा आणि प्रत्यक्ष मूर्तीच्या कामात कोणताही हलगर्जी झालेला नाही. मूर्तीचा चबुतरा काँक्रीटचा असून त्याच्या भोवताली टाकलेली मातीचा भराव पावसाच्या पाण्यामुळे दबला गेला आहे. मूर्ती उभारल्यानंतर हा पहिलाच पाऊस असून काही काळ हा भराव दबला जाणे हे नैसर्गिक असल्याचे बांधकाम अभ्यासकांनी सांगितले. यामुळे प्रत्यक्षात मूर्तीला कोणताही धोका उद्भवत नसल्याचेही ते म्हणाले.
—————————————————————-
खचलेल्या भरावाची डागडुजी सुरू
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी असलेल्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन काही प्रमाणात खचली असली, तरीही शिवरायांचा मूर्ती सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान खचलेल्या भरावाची डागडुजी करण्याचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले आहे. – अजीत पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी १, सार्वजनिक बांधकाम विभाग