Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा आरक्षणासाठी गठीत वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढविण्याचा सरकारने निर्णय

Spread the love

 

मुंबई : आरक्षणासाठी दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून जाणार नसल्याची भूमिका मराठ्यांनी घेतली आहे. आरक्षणासाठी मराठे आक्रमक झाले असताना राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता.
यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास

Spread the love  पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *