Thursday , August 27 2026
Breaking News

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या

Spread the love

 

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार घटना सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा भाजप नेते आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव करून विजयी झालेले सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चंद्रनाथ रथ असे त्यांच्या पीएचे नाव होते. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली एक व्यक्ती या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाली आहे. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये रस्त्यावरच सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारला महामार्गावर रोखलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. यामधील ३ गोळ्या लागल्याने चंद्रनाथ रथ गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रनाथ रथ हे सुवेंदू यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पीए म्हणून काम करत होते. असा आरोप आहे की, बुधवारी रात्री मध्यमग्राममध्ये एका वाहनाला घेरण्यात आले आणि त्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या.

चंद्रनाथ रथ प्रवास करत असलेल्या कारच्या पुढच्या भागाला गोळी लागल्याने कारची विंडशील्ड फुटली. कारमध्ये चंद्रनाथ रथ पुढच्या सीटवर बसले होते. चंद्रनाथ यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते कोलकाताहून मध्यमग्राम येथील त्यांच्या घरी जात होते. या गोळीबारामध्ये चंद्ररथ यांच्या कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या मध्यमग्राम क्रॉसिंग येथील विबासिटी नर्सिंग होममध्ये चंद्रनाथ यांच्या चालकावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चंद्ररथ यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर भाजपचे सर्व विजयी उमेदवार घटनास्थळी पोहोचले आहेत. कौस्तव बागची, पियुष कंदिया, शंकर घोष आणि शंकर चॅटर्जी यांच्यासह भाजपचे अनेक आमदार घटनास्थळी दाखल झालेत. संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव आहे. पोलिस, आरएएफ आणि केंद्रीय दलांच्या मोठ्या तुकडीने संपूर्ण परिसर सील केला आहे. सध्या पोलिस तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणार; लाल किल्ल्यावरून मोदींचा निर्धार

Spread the love नवी दिल्ली : देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *