दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक के. राजन यांनी आत्महत्या केली आहे. दिग्दर्शक के. राजन हे ८५ वर्षाचे होते, ते बेधडक वक्तव्यांसाठी आणि सिनेसृष्टीतील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ओळखले जात.दरम्यान वयाच्या ८५ वर्षी टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण अद्याप कळू शकले नाहीये. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने सोशल मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.
दिग्दर्शक के. राजन यांच्या निधनामुळे संपूर्ण तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना चेन्नईमध्ये घडली. ८५ वर्षांच्या के. राजन यांनी चेन्नईतील प्रसिद्ध अड्यार नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. ते बेपत्ता असल्याचं समजताच पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती.
यानंतर नदीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांनी वयाच्या या टप्प्यावर असं टोकाचं पाऊल का उचललं? यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास सध्या चेन्नई पोलीस करत आहेत. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार के. राजन यांनी नैराश्यातून जीवन संपवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
के. राजन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. चित्रपटांचे ऑडिओ लॉन्च असो वा एखादी मुलाखत, इंडस्ट्रीतील कलाकारांच्या वाढत्या डिमांडवर आणि निर्मात्यांच्या नुकसानीवर ते नेहमीच जाहीरपणे आणि कडक शब्दांत ताशेरे ओढात असायचे. अनेकदा त्यांच्या विधानांमुळे मोठे वादही निर्माण झाले होते, पण त्यांनी कधीही आपली रोखठोक भूमिका बदलली नाही.
के. राजन यांनी १९८३ मध्ये ‘ब्रह्मचारिगल’ या चित्रपटाची निर्मिती करून चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. यासोबतच ‘थंगमना थंगाची’ आणि ‘अनारचिगल’ सारख्या चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. राजन यांना अभिनयाचीही प्रचंड आवड होती. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.
Belgaum Varta Belgaum Varta