


नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.
दरम्यान, वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले. त्यांनी वांगचुक यांच्या धैर्याचे कौतुक करत, “त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा दिला,” असे म्हटले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असून, जंतर-मंतरवरील आंदोलन सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारची प्रमुख आश्वासने
20 जुलै रोजी संसदेवर शांततेने मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत विचार केला जाईल.

Belgaum Varta Belgaum Varta