रांची : झारखंडमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लोहरदगा जिल्ह्यातील एका कुटुंबाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम मुस्तफा (वय ५८) हे आपल्या कुटुंबासह लसिया गावाकडे जात होते. अघाराम परिसरात त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर जाऊन धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की वाहनाचा चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत गुलाम मुस्तफा, त्यांची पत्नी गुलशन परवीन (वय ५५) आणि त्यांच्या तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर हिना परवीन, नेहा परवीन, उमर नवाज आणि चालक अक्रम खलिफा हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रांची येथील रिम्स (RIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. रुग्णालयाबाहेर नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयात भेट देत मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. कोलेबिराचे आमदार नमन विक्सल कोंगारी, सिमडेगाचे आमदार भूषण बडा तसेच मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनीही दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta