Sunday , July 26 2026
Breaking News

एआयसीसी अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खर्गेंची उमेदवारी

Spread the love

 

वाढत्या पाठिंब्यामुळे निवडीची शक्यता, शशी थरूर, के. एन. त्रिपाठींचीही उमेदवारी

बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (एआयसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार शशी थरूर आणि झारखंडचे काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केले आहेत. खर्गे यांना वाढता पाठिंबा मिळत असून त्यांच्या विजयाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्याने मल्लिकार्जुन खर्गे यांचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे. आज सकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या समर्थक नेत्यांसह दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी बोलताना खर्गे म्हणाले, आज माझ्या पाठीशी उभे असलेले सर्व नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, मंत्री यांना माझा सलाम. सर्व नेत्यांनी मला प्रोत्साहन दिले, मी त्यांचे आभार मानतो. आम्ही १७ ऑक्टोबर रोजी निकाल पाहण्यास उत्सुक आहोत. मला विजयाची आशा आहे. मी लहानपणापासून काँग्रेसच्या विचारधारेशी जोडलेला आहे. ते म्हणाले की, मी आठवी आणि नववीत असताना गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचा प्रचार करत होतो.
याला चालना देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाच्या केवळ १० नेत्यांनीच पाठिंबा दिला नाही, तर ३० नेत्यांनी अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते ए. के. अँटनी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, हिमाचल प्रदेशचे अंकीद शर्मा, राजस्थानचे अभिषेक सिंघवी, दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय माकन, हरियाणाचे भूपिंदर सिंग हुडा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि बिहारचे तारिक अन्वर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा दिला आहे.
त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशचे सलमान खुर्शीद, पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री नारायण स्वामी आणि कर्नाटकचे सय्यद नसीर हुसेन यांच्यासह ३० हून अधिक नेत्यांनी अध्यक्षपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.
गांधी परिवार आणि जी २३ नेत्यांच्या पाठिंब्यासोबतच गांधी घराणेच खर्गे यांच्या पाठीशी उभे असल्याचे बोलले जात आहे, शिवाय, यापूर्वी काँग्रेस परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जी २३ नेत्यांनीही खर्गे यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल केल्याचे बोलले जात आहे.
केरळचे तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि झारखंडचे काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केले आहेत.
दिल्लीतील एआयसीसीच्या केंद्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली असून पक्षाचे नेते सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करू शकतात. १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *