Sunday , July 26 2026
Breaking News

मी एकटी भाजपचा पराभव करण्यास समर्थ, आम्ही स्वतंत्र लढू; ममता बॅनर्जींचा इंडिया आघाडीला मोठा धक्का

Spread the love

 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जींनी केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “माझी काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हणत आले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही”

ममता बॅनर्जींचं ‘एकला चलो रे’
लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष भारत आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक एकट्यानं लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ममता बॅनर्जींच्या या घोषणेनं विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या भविष्यावर संकटाचे काळे ढग पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी बंगालमध्ये कोणाशीही युती करणार नाही. बंगालमधील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत त्यांच्या पक्षाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ममता बॅनर्जी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, काँग्रेसनं त्यांच्याशी याबाबत काहीही चर्चा केली नाही. ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीत काही प्रस्ताव दिले, तेसुद्धा फेटाळले गेले आहेत. तसेच, काँग्रेसचा पश्चिम बंगालशी काहीही संबंध नाही, असं म्हणत ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला होता.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *