
आच्छादन नसल्याने रस्त्यावर पडतो कचरा
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराच्या स्वच्छतेचा नगरपालिकेकडून दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात शहर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे. चौकाचौकात कचऱ्याचे ढीग असून सतत कचरा पेटवण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवाय पालिकेकडून शहरातील हा कचरा संकलन करून उघड्या वाहनांतून कचऱ्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे वाहनातील कचरा रस्त्यावर पडतो. तसेच दुर्गंधीनेही नागरिक त्रस्त आहेत. यावरून पालिकेने कचरा वाहतुकीच्या नियमांचा कचरा केल्याचे चित्र आहे.
नगरपालिकेकडून शहरातील विविध भागांतून दररोज कचरा संकलित केला जातो. हा कचरा पट्टणकुडी येथील कचरा डेपोवर टाकला जातो. यासाठी पालिकेने घंटागाड्या सुरू केल्या आहेत. परंतु, या ट्रॅक्टमधून कचरा वाहतूक करताना त्यावर कोणतेच आच्छादन नसते.
परिणामी ट्रॅक्टरमधील कचरा रस्त्यावर उडतो. विशेष म्हणजे, स्वच्छता नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेकडूनच बंदिस्त कचरा वाहतुकीचा नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. शहर स्वच्छठेवण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना केल्या जातात. मात्र, कचरा वाहतुकीतच निष्काळजीपणा होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी योग्य की पावले उचलण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta