

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
निपाणी (वार्ता) : अंमली पदार्थांचे व्यसन केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंब आणि समाजालाही उद्ध्वस्त करते.अमली पदार्थ आणि धूम्रपानामुळे बुद्धीही नष्ट होऊ शकते. क्षणिक सुखासाठी मौल्यवान जीवचा बळी देऊ नका. तरुण पिढी ही देशाची संपत्ती असून अंमली पदार्थांचे गुलाम होऊ नका. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन यकृत, मूत्रपिंड आणि हृदय यांच्याशी संबंधित गंभीर आजार होतात मेंदूच्या पेशी नष्ट झाल्याने विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती पूर्णपणे नाहीशी होते. त्यामुळे आपली पदार्थापासून दूर राहावे असे आवाहन चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांनी केले.
बेळगाव जिल्हा पोलिस, चिक्कोडी उपविभाग, निपाणी मंडल पोलीस कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.२४)अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थी व युवकांनी अमली पदार्थ सेवन न करण्याची प्रतिज्ञा केली.
तहसीलदार सुरेश मुंजे यांनी, अंमली पदार्थामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध आजार सहजपणे सुरू होतात. इंजेक्शनद्वारे अंमली पदार्थ घेतल्याने एचआयव्ही आणि हिपॅटायटीससारखे प्राणघातक आजार अनेकांना जडले आहेत.
तीव्र नैराश्य, अत्यधिक चिंता आणि मनःस्थितीत चढ-उतार झाल्याने व्यक्ती दगावू शकतात.
व्यसनी व्यक्तीच्या वर्तनामुळे कुटुंबात सतत भांडणे, अशांतता आणि मानसिक हिंसाचार निर्माण होतो. शिवाय कर्जबाजारी, दिवाळखोरी, मालमत्तेचे नुकसान अशा घटनाही घडू शकतात. त्यामुळे युवकांनी अमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील विविध मार्गावरून रॅली काढून येथील म्युनिसिपल हायस्कूल पटांगणावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विविध पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक, विविध कॉलेजचे छात्र सैनिक आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta