धाराशिव : अखिल भारतीय साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या शिफारशीनुसार परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी बिदर जिल्हाध्यक्षपदी तुकाराम मोरे यांची निवड जाहीर केली. या निवडीमुळे बिदर जिल्ह्यातील मराठी साहित्यिक व मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दि. २९ व ३० मे २०२६ रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात, लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. नंदकुमार राऊत व स्वागताध्यक्ष म्हणून आमदार कैलासदादा पाटील उपस्थित होते.
याच भव्य साहित्यिक व्यासपीठावर आमदार कैलासदादा पाटील यांच्या हस्ते तुकाराम मोरे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचा गौरव केला.
यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी बिदर जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या माध्यमातून सीमाभागातील नवोदित साहित्यिकांना आपल्या साहित्यकृती सादर करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सीमाकवी रवींद्र पाटील म्हणाले, “सीमाभागातील मराठी साहित्य संमेलने ही केवळ साहित्यिक मेजवानी नसून मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेची जपणूक करणारी चळवळ आहे. बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांना मातृभाषेच्या सेवेसाठी आणि साहित्यिक उपक्रमांसाठी अखिल भारतीय साहित्य परिषद भक्कम पाठबळ देईल.”
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तुकाराम मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मराठीची ही साहित्यिक पालखी बिदर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येतील. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देत मराठी साहित्य चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहू.”
यावेळी तुकाराम शेडोळे, दत्तात्रय साबणे, डी. एम. स्वामी, विद्यासागर पाटील, महेश हुलसुरकर यांच्यासह साहित्यप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta