Sunday , June 7 2026
Breaking News

खातेवाटपावरील वाद मिटला; रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा घेतला मागे

Spread the love

 

बंगळूर : जलसंपदा खाते मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले रामलिंगा रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर आणि समेटाच्या प्रयत्नांनंतर आपला राजीनामा मागे घेतला आहे.

खातेवाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि मतभेद आता निवळल्याचे दिसत आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रामलिंगा रेड्डी म्हणाले, “मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला आहे. राजीनामा स्वीकारला जाणार नाही, म्हणजे तो फेटाळण्यात आला असेच समजावे.”

ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री आणि हायकमांडच्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे. खातेवाटपाचा विषय मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी योग्य प्रकारे हाताळतील, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्व गैरसमज आणि मतभेद दूर झाले आहेत.”

या घडामोडींमुळे काँग्रेस सरकारमधील खातेवाटपावरून निर्माण झालेला पहिला मोठा वाद तात्पुरता तरी शांत झाल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्री शिवकुमार, सुरजेवालांशी चर्चा
या आधी मंत्री रामलिंगा रेड्डी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम होते. मुख्यमंत्री शिवकुमार आणि काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
माझे मत यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शुक्रवारी (ता. ५) रात्री मुख्यमंत्री शिवकुमार आणि सुरजेवाला यांची भेट घेतली. त्यांच्यासमोरही मी तेच मत मांडले. त्यांनी यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे सांगितले आहे. आता त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे, असे माध्यमांशी संवाद साधताना रेड्डी यांनी स्पष्ट केले होते.
शिवकुमार यांनी भेटीसाठी फोन केला होता. ते घरी नसल्याने शहरातील खासगी हॉटेलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत माध्यमांसमोर मांडलेले सर्व मुद्दे त्यांनी पुन्हा नेतृत्वासमोर ठेवले. माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीही कोणतेही विशिष्ट खाते मागितले नाही. मात्र, दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही, यामुळे निराशा झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सुरजेवाला यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केल्याचे सांगत रेड्डी म्हणाले, ‘आता पक्ष नेतृत्व चर्चेत व्यस्त आहे. त्यांनी पुन्हा राजीनामा मागे घेण्यास सांगितले तरी मी त्यास सहमती देईन की नाही, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.’
लॉबिंगच्या आरोपांना फेटाळताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘१९९३ पासून आजपर्यंत मी कधीही मंत्रिपद किंवा विशिष्ट खाते मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. उलट पक्ष नेतृत्वानेच मला आश्वासन दिले होते.’
——————————————————————–
‘मी संयम सोडलेला नाही’
आपण संयम गमावला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर रेड्डी म्हणाले, ‘मी अजूनही संयम सोडलेला नाही. संयम गमावला असता तर तुमच्याशी इतक्या शांतपणे बोलत बसलो नसतो.’

About Belgaum Varta

Check Also

राज्याचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार शपथबध्द

Spread the love  जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री; १३ सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न बंगळूर : काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *