कर्मचारी व आगार व्यवस्थापक वाद चिघळला
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड एस.टी. आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक अमर निकम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी चदगड आगारातील जवळपास २०० कर्मचारी सोमवार दि. २० जून पासून सामूदायिक रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याने पुन्हा एसटीचा प्रश्न पेटणार आहे.
या संदर्भातील आगार व्यवस्थापकांच्या विरोधात तक्रार पत्र
दिनांक 10 जून रोजी विभाग नियंत्रक श.प.अ कोल्हापूर विभाग यांना दिले आहे. यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी व सुरक्षा दक्षता अधिकारी यांनी भेट देवून चौकशी केली होती. यामध्ये चंदगड प्रभारी आगार व्यवस्थापक यांची चंदगड आगारातून बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वेटीस धरल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे प्रभारी आगार व्यवस्थापक अमर निकम यांच्यासोबत काम करण्याची सर्व कर्मचाऱ्यांची अजिबात इच्छा नाही. चंदगड आगारातील प्रत्येक कर्मचारी ताण तणावातून जात आहे, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांचा तब्येतीवर होवून बिपी, शुगुर मानसिक आजार वाढत आहेत. आगार व्यवस्थापक यांच्याकडून कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून, हेतूपुरस्करपणे, ठरवून त्रास दिला जात आहे. रजा बिनपगारी करणे, ठराविक कर्मचाऱ्यांचे रजा अर्ज बाजूला काढून ठेवणे, जाणूनबुजून कर्मचाऱ्यांचे अडीअडचण असताना आर्थिक नुकसान कसे करता येईल याकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष आहे. या सारखे अनेक गंभीर आरोप चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी आगार
व्यवस्थापकावर करून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे . याची दखल घेतली नाही तर सोमवार दि. २० जून पासून सर्व कर्मचारी सामुदायिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामूळे आगार व्यवस्थापक व कर्मचारी यांचा संघर्ष पेटून त्याचा फटका एसटी बस वाहतूकीवर होऊन प्रवासी व विद्यार्थी
याना बसणार हे मात्र निश्चित.