खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव यांच्या सूचनेनुसार मणतुर्गा गाव ते गावठाण रस्ता प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण मिळाले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासन, शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला.
आज दुपारी १२ वाजता तहसीलदार, सर्वे विभागाचे अधिकारी, पीडीओ, काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार तसेच ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित राहिले. शेतकरी ईश्वर बोबाटे आणि इतर संबंधित शेतकरीही चर्चेत सहभागी झाले.
ग्रामस्थांना आवश्यक असलेला रस्ता व्हावा आणि त्याचवेळी शेतकऱ्यांचे नुकसान टाळले जावे, अशी भूमिका ब्लॉक काँग्रेसने घेतली होती. यापूर्वी तहसीलदार आणि सर्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी वस्तुस्थिती मांडून चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदारांनी सर्व संबंधितांना नोटीस बजावून संयुक्त पाहणी आयोजित केली.
बैठकीत सर्व घटकांशी चर्चा करून सामंजस्याचा मार्ग स्वीकारण्यात आला असून, भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी बॉण्ड पेपरवर सह्याही घेण्यात आल्या. शेतकऱ्यांनी रस्त्याला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, रस्ता शेताच्या मध्यभागातून न नेता एका बाजूने काढावा तसेच सीडी (क्रॉस ड्रेनेज) संदर्भातील अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी केली.
यावर तत्काळ कार्यवाही करत संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील वर्षात नवीन सीडी मंजूर करण्याबरोबरच गावाकडील उर्वरित रस्त्याच्या कामालाही मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली. “आमचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने काम करण्यात यावे,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
यावेळी अमृत शेलार, ईश्वर बोबाटे, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भुजंग पाटील, विठ्ठल उर्फ बाळू पाटील, सुरेश जाधव भाऊ, नगरसेवक तोहीद, साईश सुतार, भूषण पाटील, अभिषेक शहापूरकर, यशवंत देसाई (कारलगा), पत्रकार वासुदेव चौगुले तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta