


खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा कळसा भंडुरा प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा वळविण्याचा घाट घातला आहे तसेच कुसमळी, पारिश्वाड येथून तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी मलप्रभा नदी आणि तिच्या उपनद्या, नाल्यांचे पाणी अडवून ते इतर जिल्ह्यांना देण्याचा घाट घातला आहे. सदर प्रकल्पामुळे खानापूर शहर तसेच तालुक्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविले जाणार असून भविष्यात यामुळे खानापूरवासीयांना भयंकर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. तसेच घनदाट जंगल आणि जैवविविधतेने नटलेल्या तालुक्याला जणू वाळवंटच बनवण्यात येईल. सदर प्रकल्पामुळे खानापूर तालुक्याला काडीचाही फायदा नसून उलट मोठे नुकसान होणार आहे. तरी या राक्षसी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तसेच सीमाप्रश्न संदर्भात तसेच संघटनेच्या इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि इतर सदस्यांना येण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाने सुरू केलेल्या एक लाख सह्यांचे पुस्तक संबंधित कार्यकर्त्यांनी बैठकीला येताना सोबत आणावे आणि या बैठकीला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta