Tuesday , April 21 2026
Breaking News

खानापूर ता. समितीच्या बैठकीत माजी आमदार अरविंद पाटील यांचा निषेध

Spread the love

एकीच्या प्रक्रियेचे बैठकीत स्वागत

खानापूर : बुधवार दि. 2 मार्च रोजी खानापूर येथील राजा शिव छत्रपती स्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक तालुका समितीचे अध्यक्ष देवप्पा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. समितीच्या जीवावर आमदारकी भूषविलेले मात्र वयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षाशी संधान बांधून भाजप प्रवेश केलेल्या खानापूरच्या माजी आमदार अरविंद पाटील यांच्या निषेधाचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला, तसेच माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटाने एक मार्च रोजी बैठक घेऊन एकिसंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमून एकीची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रस्ताव समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी दूरध्वनीद्वारे कळविला आहे. तसेंच वर्तमानपत्रात देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास संमती दर्शवावी व तालुका समितीने दहा सदस्यांची एक समिती नेमावी व त्या समिती समोर दिगंबर पाटील यांच्या त्रिसदस्यीय समितीने एकिसंदर्भात चर्चा करावी. मात्र तारखेचे निर्बंध दिले आहेत ते मात्र आम्हाला मान्य नाहीत, असे कार्याध्यक्ष मारुती परमेकर यांनी सांगितले.

मागील वर्षभर खानापूर तालुक्यात खानापूर युवा समिती स्थापन करून युवकांनी मराठी माणसांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून विविध कार्यात सहभाग दर्शविला. मराठी संस्कृती, मराठी भाषा तसेच इतर नागरी समस्याबाबत वेळोवेळी आवाज उठवून त्यानी जे कार्य केले आहे ते कौतुकास्पद आहे, त्यामुळे या एकीच्या प्रक्रियेत युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील व इतर सदस्यांना स्थान देण्यात यावे, असे मत गोपाळ पाटील यांनी मांडले.

समितीमध्ये एकी ही मराठी माणसाच्या न्याय व हक्कासाठी व मराठी अस्मितेसाठी आवश्यक असून या प्रक्रियेत सर्वांनी सहभाग घ्यावा तसेच पुढील कार्याची रूपरेषा ठरवावी, असे मत सचिव गोपाळ देसाई यांनी मांडले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ही शिखर समिती असून त्यांच्या अधिपत्याखाली एकी होत असेल तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे, असे मत रणजीत पाटील यांनी मांडले.

जोपर्यंत समोरासमोर येऊन चर्चेला सुरवात होत नाही तोपर्यंत व्यापक बैठकीचे प्रयोजन काय? असा सवाल राजाराम देसाई यांनी उपस्थित केला.

एकीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तालुक्यात जागृती करून एक भव्य व्यापक बैठक बोलवावी व राष्ट्रीय पक्षात गेलेल्या माजी लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध नोंदवावा असे मत पांडुरंग सावंत यांनी मांडले.

दिगंबर पाटील गटाने एकीच्या प्रक्रियेसाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे ती जर चर्चेसाठी येत असेल तर त्यांचे स्वागतच व्हायला पाहिजे व यापुढे समितीत राहून राष्ट्रीय पक्षाशी संधान साधून राहणाऱ्याना बाहेरचा रास्ता दाखवावा, असे मत सुरेश देसाई यांनी मांडले.

खानापूर तालुका समितीमधील दुही मिटणे ही काळाची गरज आहे. आम्ही युवा समितीच्या माध्यमातून गेले वर्षभर कार्यरत आहोत एकीसाठी आम्ही तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आता कुठे यश येताना दिसत आहे, पण हे यश क्षणभंगुर न होता संवेदनाने याला भक्कम स्वरूप यावे, असे मत युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मांडले.

या बैठकीला सूर्याजी पाटील, संभाजीराव देसाई, सदानंद पाटील, राजू पाटील, प्रतीक देसाई, विनायक सावंत, पुंडलिक पाटील (करंबळ), रामचंद्र गावकर, अजित पाटील, रवी पाटील, पुंडलिक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *