मुंबई : कोल्हापूरची लाडकी हत्तीण ‘माधुरी’ आता पुन्हा आपल्या घरी परतण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरापासून गुजरातमधील ‘वनतारा’ येथे तिच्यावर विशेष उपचार सुरू होते. या उपचारांना यश मिळाल्यानंतर तिची प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
माधुरीला ३० जुलै २०२५ रोजी वनतारामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिच्या पायांच्या हाडांना गंभीर इजा झाली होती आणि चालण्यातही तिला मोठ्या अडचणी येत होत्या. तिच्या उपचारासाठी पशुवैद्यक, हत्ती संवर्धन तज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि प्राणी कल्याण अधिकारी यांची विशेष टीम कार्यरत होती.
प्रकृतीत लक्षणीय सुधारणा
सुमारे एका वर्षाच्या काळजीपूर्वक उपचारांनंतर माधुरीच्या हालचालींमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. तिची प्रकृती सध्या वैद्यकीयदृष्ट्या स्थिर, कार्यक्षम आणि सुधारत असलेली असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पायांच्या हाडांची स्थिती लक्षात घेता कोल्हापूरमध्येही तिच्यावर दीर्घकालीन उपचार आणि नियमित वैद्यकीय देखरेख आवश्यक राहणार आहे.
विशेष आहाराने मिळाली ताकद
वनतारामध्ये माधुरीला दररोज सुमारे १८० किलो ताजे हिरवे गवत दिले जात होते. याशिवाय फळे, भाज्या, झाडपाला, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक औषधांचा समावेश असलेला पोषक आहार देण्यात आला. यामुळे तिच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून आले.
भावनिक निरोपाची तयारी
वर्षभर माधुरीची सेवा करणाऱ्या वनताराच्या कर्मचाऱ्यांसाठी तिचा निरोप हा भावनिक क्षण ठरणार आहे. कोल्हापूरमध्ये परतल्यानंतरही पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली तिचे उपचार आणि नियमित तपासण्या सुरू राहणार आहेत.
“दीर्घ उपचारांनंतर नवसंजीवनी मिळालेली माधुरी आता पुन्हा कोल्हापूरच्या भूमीत पाऊल ठेवणार असल्याने प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.”
Belgaum Varta Belgaum Varta