रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड आणि भोस्ते गावांच्या दरम्यान वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका युवकाला सुखरूप वाचवण्यात यश आले असून, या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार युवक खेड-भोस्ते दरम्यानच्या जगबुडी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या पात्रात उतरल्यानंतर तिथल्या पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज या युवकांना आला नाही. यामुळे चारही जण पाण्यात बुडू लागले.
एकाचा वाचला जीव, तिघांचा मृत्यू
युवकांनी पाण्यात बुडताना आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने एका युवकाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने उर्वरित तीन युवकांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने हा घात झाल्याचे बोलले जात आहे. एकाच वेळी तीन तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे युवक कुठले होते आणि त्यांची नावे काय, याचा सविस्तर तपास खेड पोलीस करत आहेत.
तिघेही सख्खे भाऊ होते
कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या अनिल दगडू कांबळे यांचे चार पुतणे मुंबईवरून आले होते. उकाड्यापासून दिलासा मिळावा तसेच पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ते जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. बदामीच्या पऱ्या येथील खोल डोहात ते पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले.
या दुर्घटनेत गोपाळ रामा कांबळे (वय ४०) या मोठ्या भावाचा जीव वाचला, तर आकाश रामा कांबळे (वय २३), नरेश रामा कांबळे (वय २२) आणि कैलास रामा कांबळे (वय १७) या तिघांचा मृत्यू झाला.
Belgaum Varta Belgaum Varta