नवी दिल्ली : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. सुरक्षा दलांनी ८ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांकडून संयुक्तपणे ही कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी या भागांत मोठ्या प्रमाणावर पोलीस दलास तैनात केले आहे. दरम्यान, एक कोटींचे बक्षीस असलेला विवेक दास्ते या चकमकीत ठार झाला आहे.
सुरक्षा दलांना घटनास्थळावरून एक इन्सास रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल आणि इतर वस्तू जप्त मिळाल्या आहेत. सोमवारी सकाळी पाच वाजता बोकारोच्या लालपाणी पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडा टोली आणि सोसोजवळ ही चकमक सुरू झाली. शोध मोहिमेसोबतच मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरूच आहे.
झारखंडमधील चाईबासा भागात 12 एप्रिल रोजी आयईडी ब्लॉस्ट झाला होता. त्यात एका जवानाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी झारखंडमधील जरायकेला भागात एंटी नक्सल अभियान दरम्यान सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली.