अक्कोळ ग्रामपंचायतीचा निर्णय : अतिवृष्टी कोरोनामुळे ग्रामस्थांना दिला दिलासा
निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबियांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे शिवाय दरवर्षी होणार्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन अक्कोळ येथील ग्रामपंचायतीने बैठक घेऊन वर्षभराचा घरफाळा आणि पाणीपट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता मुधाळे होत्या. तर व्यासपीठावर ग्रामपंचायत उपाध्यक्ष इंद्रजीत सोळांकूरे उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी शेती सह इतर उद्योग व्यवसायावर गदा आली. अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले असून बऱ्याच लोकांना नोकरीही गमवावी लागली. परिणामी ग्रामस्थांवर आर्थिक संकट कोसळले आहे ही बाब लक्षात घेऊन सन २०२२-२३ सालातील घरफाळा व पाणीपट्टी स्थगित करण्यात आले आहे तर चालू वर्षातील घरफाळा व पाणीपट्टीमध्ये सवलत दिली जाणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष इंद्रजीत सोळांकूरे यांनी केले. कोरोना आणि अतिवृष्टीचा सर्वांनाच फटका बसला आहे परिणामी आर्थिक स्थिती बिकट झाली आहे ही बाब लक्षात घेऊन वसुलीसाठी तगादा लावला नाही. गावातील विविध समस्या निकालात काढण्यासाठी थकीत वीज वसुलीला प्राधान्य द्यावे लागते. याला अनुसरून ग्रामस्थांनी थकीत बिलाची पूर्तता करून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले. मध्यंतरी वीज टंचाईमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला सध्या प्रलंबित कामाची पूर्तता झाली असून पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी नियमितपणे पाणीपुरवठा करावा स्वच्छता कामगारांनी ही दक्षता बाळगून गावच्या कामांनाही प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील, संपत स्वामी, दीपक कोळी, पोपट वडर, श्रीकांत कोळी, रामा बन्ने, पोपट पाटील, ऍड. विकास संकपाळ, सुधाकर चव्हाण, जगदीश साबळे, मेघा वाडकर, उज्वला मोहिते, स्वाती मगदूम, अनिता कुंभार, साधना पाटील, रेखा मिसाळ, सुवर्णा नाईक, यशोदा घस्ते, पुनम घवे, नीता राजापुरे, ग्राम विकास अधिकारी ए. एम. गोयागोळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गजानन पाटील यांनी आभार मानले.
१७.५५ लाखाचा फाळा रद्द
जाहीरनामानुसार गावातील वार्षिक घरफाळा ९ लाख पंधरा हजार रुपये आणि पाणीपट्टी ८ लाख ७० हजार इतका आर्थिक ताण ग्रामपंचायत त्रास सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अनावश्यक कामे थोडा काळ प्रलंबित ठेवून गरजू कामांना प्राधान्य द्यावे. कामगारांनीही या सूचनेचे पालन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.