Tuesday , April 21 2026
Breaking News

शेतकरी विरोधी मागे घेतलेला कायदा पास होईपर्यंत आंदोलन सुरूच

Spread the love

राजू पोवार : निपाणीत संविधान दिन कार्यक्रम
निपाणी : केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्‍यांच्या विरोधातील काळा कायदा संदर्भात देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी तब्बल वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने नमते घेऊन सर्व तिन्ही कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा नैतिक विजय झाला आहे पण अजूनही राज्य आणि लोकसभेमध्ये हा कायदा मागे घेतल्याचे बिल पास झालेले नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ सुरू केलेल्या आंदोलनाला शुक्रवारी (ता. 26) एक वर्ष पूर्ण झाले आहे. शिवाय भारतीय संविधानाला 72 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथील नगरपालिका कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पोवार बोलत होते. पोवार म्हणाले, डॉ आंबेडकरांमुळेच समाजातील सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळाला आहे. या संविधानामुळे अन्यायाविरोधात आवाज उठवता येणे शक्य झाले आहे. यापुढील काळात सरकारने शेतकरी कुटुंबियांचे वीज घरफाळा पाणीपट्टी माफ करणे आवश्यक आहे. नदीकाठच्या शेतकर्‍यांचे झालेले नुकसान निपक्षपणे सर्वे करून भरपाई दिली पाहिजे. आपला लढा सरकार पक्ष जाती-धर्माविरोधात नसून शेतकर्‍यावर होणारा अन्यायासंदर्भात सुरू आहे. तात्काळ लोकसभा व राज्यसभेत शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याचे बिल पास करावे अन्यथा लवकरच आंदोलनाची दिशा ठरवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोवार यांनी दिला.
संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष आय. एन. बेग यांनी, राजकीय पक्षांनी भारतीय राज्यघटना खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे शिवाय देशात हुकूमशाही सुरू आहे. त्या विरोधात आवाज उठविणार्‍यांवर देशद्रोही गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे यापुढील काळात शेतकर्‍यांनी एकसंघ राहून लढा देण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष सुधाकर माने, महेश धम्मरक्षीत, कॉम्रेड अनिल ढेकळे, प्रवीण सूतळे, बाळासाहेब हादीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बेळगाव नाक्यावर काही वेळ रास्ता रोको करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.
प्रारंभी राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्राम धामापासून नगरपालिके जवळील डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत रयत संघटनेने रॅली काढली राजू पोवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवान गायकवाड यांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास कलगोंडा कोटगे, सुखदेव मगदूम, विवेक जनवाडे, महेश जनवाडे, बाळासाहेब पाटील, बाबासो पाटील, अल्लाउद्दीन जमादार, महादेव शेळके, वसंत कुरणे, संजय कांबळे, गणपती कांबळे, नामदेव साळुंखे, कुमार पाटील, संजय जोमा, सदाशिव खोत, राजेंद्र खोत, राजेंद्र सूतळे, बाबासो कांबळे, दाऊद मुल्ला यांच्यासह निपाणी परिसरातील रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते संतोष मेस्त्री यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *