निकु पाटील यांचा आरोप: कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
निपाणी (वार्ता) : लखनापुर-श्रीपेवाडी या मार्गावर वाहनधारकासह शेतकऱ्यांची नेहमी वर्दळ असते. पण अत्यल्प निधीमुळे या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप येथील टाऊन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी पत्रकान्वये केला आहे.
पत्रकातील माहिती अशी, लखनापूर-श्रीपवाडी पुलाजवळील भराव दरवर्षी पावसाळ्यात वाहुन जातो. गेल्या पंधरा दिवसात झालेल्या वळीवाच्या मुसळधार सरीमुळे पुलाजवळील भराव वाहुन गेला आहे. त्यामुळे जाधव आणि चिमगावकर मळ्यातील नागरिकासह महिला, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकाळात हा रस्ता पुर्ण केला होता. त्यामुळे श्रीपेवाडी, पडलीहाळ कमत आणि लखनापूर परिसरातील नागरिकांची सोय झाली होती. पण आमदार शशिकला जोल्ले यांनी मागील चार वर्षांपूर्वी आपल्या फंडातून अत्यल्प निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्याछ त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी पुलाबाबत ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.