‘गोमटेश’मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा आपल्यातले सुप्तगुण कसे ओळखावेत आणि त्या गुणांचा विकास कसा करावा. परीक्षेच्या कालावधीत पालकांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या शिवाय अभ्यासामुळे घरातील वातावरण हे चांगले राहावे यासाठी कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी मनावर दडपण न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. सर्वसामान्य कुटुंबातील आलेले हे विद्यार्थी गोमटेशच्या माध्यमातून खरीखुरी प्रगती करत आहेत, असे प्रशंसोद्गार संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. सोहन तिवडे यांनी काढले.
बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीमध्ये आयोजित दहावी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक वैशाली देशमाने यांनी केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकाग्रता कशी साधावी. पाठांतर न करता लक्षात कसे ठेवावे. अभ्यासाचे नियोजन कसे करावे. दहावीनंतर ध्येय कसे ठरवावे. त्यात यशस्वी होण्यासाठी काय करावे, काय करू नये. या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीत प्रा. तिवडे यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
प्राचार्य दीपाली जोशी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्राचार्य ज्योती हरदी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दहावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षीका उपस्थित होते.