![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220308-WA0051-245x300.jpg)
डॉ. मोहन भस्मे : निपाणीत बालविवाह प्रतिबंध अभियान
निपाणी(वार्ता) : कायद्यानुसार बालविवाह हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा होणार नाही ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तरीदेखील आज कमी प्रमाणात का होईना बालविवाह होत आहेत, हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास त्याची तात्काळ कल्पना दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणे शक्य होणार आहे. मुलींना चांगल्या पद्धतीचे शिक्षण देऊन त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. अशावेळी बालविवाह रोखण्यासाठी समाजात जागृती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले. महिला व बालकल्याण विभाग तसेच तालुका प्रशासन यांच्यावतीने बालविवाह प्रतिबंधक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार डॉ. मोहन भस्मे व उपनगराध्यकक्षा नीता बागडे यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निता बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थित सर्वांनी बालविवाह निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली. यानंतर येथील धर्मवीर संभाजी चौकात जनजागृती व मानवी साखळी करून बालविवाह रोखण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी के. सुमित्रा, नगरसेविका सुजाता कदम, उपासना गारवे, दिपाली गिरी, कावेरी मिरजे, सोनल उपाध्ये यांच्यासह अधिकारी, विविध स्त्री शक्ती मान्यवर, अंगणवाडी संघाच्या सदस्या, कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.