
निपाणी (वार्ता) : भर उन्हात बांधकामे करणे हे कामगार आणि बांधकाम गुणवत्ता या दोन्ही दृष्टीने आव्हानात्मक ठरत आहे. सध्या शहर आणि परिसरात पहाटे पासून बांधकामांना सुरुवात केली जात आहे. तर दुपारी बारा वाजता काम बंद करून पुन्हा सायंकाळी चार नंतर ही कामे केली जात आहेत. त्यामुळे उन्हाचा बांधकाम व्यवसायावरही परिणाम जाणवत आहे.
साधारण सायंकाळी चारच्या सुमारास सूर्याचा ताप कमी झाला, की पुन्हा पुढचे दोन-तीन तास काम केली जात आहेत. पारा ४१ अंशांच्या आसपास असल्यामुळे ११-१२ ते ३-४ वाजेपर्यंत तीव्र ऊन जाणवत आहे यावेळी काम करणे अशक्य असून घरे,इमारत बांधकामावरचे काम धोकादायकच ठरण्याची ठरत आहे. तीव्र उन्हात उष्माघाताचाही धोका असल्याने बांधकाम मजूर सकाळी साडेसहा सातच्या सुमारासच कामास सुरुवात करत आहेत. दुपारी विश्रांती घेऊन पुन्हा चारच्या सुमारास कामे सुरू करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामेही सकाळी लवकर सुरू केली जात आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे डांबरीकरणाची कामे बऱ्यापैकी बंद आहेत.
भर उन्हात काम करताना कामगारांना चक्कर येणे, डी हायड्रेशन किंवा उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक ऊन टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा काम करणे योग्य ठरत आहे. काही ठिकाणी कामगारांसाठी सावली, शीतपेये आणि पुरेशा पिण्याच्या पाण्याची सोय करून बांधकामे केली जात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta