
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, मतिवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम आठवड्याभरात सुरू करावे. अन्यथा २० रोजी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांनी प्रशासनाला दिला.
आप्पाचीवाडी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुल निर्मिती व आंदोलन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.११)आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
आनंदा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
राजू पोवार म्हणाले, लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे होऊन पुलाच्या कामाचा पाठपुरावा करावा. २५ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेली जात आहे. ११ मार्च रोजी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
प्रशासनाला २० तारखेपर्यंत अल्टिमेट देत आहोत. आठवड्याभरात कामास सुरुवात न झाल्यास रयत संघटनेतर्फे पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा थेट इशारा पोवार यांनी दिला.
आमदार आणि खासदार निवडणूक प्रचाराची सुरुवात आप्पाचीवाडी येथून करतात. मात्र अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, ही खेदाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी रस्ते आणि पुलांची निर्मिती करणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संदीप पाटील, निपाणी शहर उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, बाबुराव खोत, सतीश पाटील, सुनील पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बाबुराव खोत, सूर्याजी पोटले, लक्ष्मण आंबणे, धनाजी पोटले, सचिन पाटील, बी.एच. बोटे, अशीर करो, श्रीपती माने, बाळासाहेब गारगोटे, गोपाळ माळी, बाळासाहेब पाटील, सागर पाटील, दादासाहेब चौगुले, मधुकर पाटील, प्रकाश आंबी, एकनाथ सादळकर, बाबासाहेब निगवे, प्रकाश घाटगे, बाळू सांगावे यांच्यासह आप्पाचीवाडी, मतिवडे, सुळगाव, हदनाळ येथील ग्रामस्थ, शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta