
दत्ता म्हेत्रे; शेंडूरमध्ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे मार्गदर्शन
निपाणी( वार्ता) : शेतकऱ्यांनी प्रमुख पिकांपैकी ज्वारी, भुईमूग, भात व तूर या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी नगदी पिकांवर भर द्यावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहून शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होऊ शकतो. शेतीची उत्पादकता कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. यावर विचार करुन शेतकऱ्यांनी शेतातील कर्ब कसा वाढेल यासाठी खतांचा योग्य वापर, घरच्या घरी निविष्ठा तयार करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वैज्ञानिक व समन्वयक दत्ता म्हेत्रे यांनी केले.
रासाई शेंडूर येथे कृषी विज्ञान केंद्र, तुकानट्टी व रयत संघटनेतर्फे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पीक नियोजन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी आर. एम. पाटील हे होते.
शिवाजी वाडेकर यांनी स्वागत केले. अशोक तोडकर यांनी प्रास्ताविक केले.
कृषी पंडित सुरेश देसाई यांनी एकात्मिक शेतीचा आपला अनुभव सांगून शेतकऱ्यांनी आलटून पलटून पिके घेण्याचे आवाहन केले. आर. एम. पाटील, संस्थापक अध्यक्ष-बेळगाव जिल्हा एकात्मिक विकास संस्था (बर्ड्स), बुदिहाळ येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश पाटील व सौंदलगा येथील प्रगतीशील शेतकरी संजय शिंत्रे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. बाळू खराडे यांनी सूत्रसंचालन तर मारुती लाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रयत संघटनेच्या कार्यकत्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शेंडूर, गोंदिकुप्पी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta