
निपाणी (वार्ता) : चार महिन्यांपासून प्रभाग क्रमांक १५ मधील पाणी समस्येबाबत नगरपालिकेला वेळोवेळी कळवले आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना झालेली नाही. सध्या प्रभागात दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. येथे बुधवारपर्यंत पाणी समस्या निकाली काढावी अन्यथा नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांनी दिला.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरातील पाणी समस्या दिवसेंदिवस डोके वर काढत आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, हेस्कॉमचा आळशीपणामुळे आठ ते दहा दिवसांनी आणि तोदेखील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा होत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्येही पाणी समस्येचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात माजी सभापती जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगरपालिकेला निवेदन दिले.
निवेदनात, निपाणी नगरपालिकेला प्रभागातील पाणी समस्या संदर्भात चार महिन्यांपासून पत्र आणि सूचना देऊनही याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. प्रभाग १५ मध्ये एकही कुपनलिका नसल्याने पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही. प्रभागातील पाणी पुरवठ्याचे ढिसाळ नियोजन लपविण्यासाठी काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
बुधवार २० मेपर्यंत प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा प्रभागातील महिलांसह नगरपालिकेवर घागर मोर्चा आणण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मुदस्सर बागवान, पार्श्वनाथ कागे, समीर सातारे, इमरान जमखानेवाले, मुनाफ संकेश्वरे, राजू केलेवाले, बालेचंद आठवडे, अरमान बागवान यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta