

कारागिरांच्या हाताला पावसाळ्यात काम
निपाणी (वार्ता) : आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या छत्रीच्या दुरुस्तीची कामांची धांदल सुरू झाली आहे. त्यामुळे कारागरांच्या हाताला हंगामी स्वरूपात का होईना, काम मिळाले आहे. त्यामुळे येथील बस स्थानक परिसरात अनेक कारागीर दिवसभर छत्र्या दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. यंदा नवीन क्षेत्रांचे दरर वाढल्याने जुन्या छत्र्या दुरुस्त करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
काही वर्षांपूर्वी छत्री विकत घेतली की, कमीत कमी चार-पाच वर्षे वापरल्या जात होती. पावसाळा संपल्यानंतर छत्री व्यवस्थित ठेवली जात होती. तर पावसाळा सुरू झाला की छत्री वापरताना छत्रीच्या काड्या तुटल्या, कपडा फाटला किंवा बिघडली असेल तर दुरुस्ती करून घेतली जात होती. त्यामुळे पावसाळ्यात शहरातील बस स्थानक परिसर, चौकाचौकांत रस्त्याच्या बाजूला तसेच आठवडी बाजारात छत्री कारागीर बसून दिवसभर काम करत होते. परंतु आता छत्री दुरुस्ती करण्याकरिता ४० ते ५० रुपये खर्च करण्यापेक्षा अनेक जण दीडशे ते दोनशेहे रुपये किंमतीची नवीन छत्री खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे छत्री कारागिरांना किरकोळ प्रमाणात काम मिळत आहे. बहुतेक कारागिरांनी छत्री दुरुस्ती व्यवसाय बंद केला आहे.
अनेकांनी आर्थिक तरतुदीनुसार नवी किंवा जुनी दुचाकी खरेदी केली आहे. निपाणी भागात दुचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक जण बस गाडी किंवा इतर वाहनाची वाट पाहण्यापेक्षा दुचाकीने प्रवास करताना दिसत आहेत. दुचाकी वाहनावर प्रवास करताना छत्रीपेक्षा रेनकोट सोयीचा असल्याने यावर्षी छत्रीपेक्षा रेनकोटची मागणी वाढली आहे.
‘गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात छत्री दुरुस्ती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होतो. पण गेल्या दोन वर्षात वाहनांची संख्या वाढल्याने रेनकोट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जुन्या छत्री दुरुस्तीसाठी मोजकेच लोक येत असल्याने या हंगामात उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याचे छत्री दुरुस्ती कारागीर पांडू गोसावी यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta