

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी कोल्हापुर येथे उच्चशिक्षण घेत आहेत. परंतु महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष कर्नाटकातील शैक्षणिक वर्षापेक्षा दोन महिने लवकर सुरू होत असल्याने निपाणी आगार प्रमुखांनी येथील विद्यार्थ्यांना कर्नाटक शासनाच्या शैक्षणिक वर्षापासून बस पास देत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे पालक हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत. महाराष्ट्र शासनाने सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी खास सवलत म्हणून शिवाजी विद्यापीठात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत.
त्यामुळे निपाणी भागातील विद्यार्थी कोल्हापूरला दररोज ये- जा करतात. त्यामुळे तात्काळ बस पास देण्याच्या मागणीचे निवेदन बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, आगार प्रमुखांच्या आडमुठे धोरणामुळे येथील विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बरेचसे विद्यार्थ्यांचे पालक हे मध्यमवर्गीय असल्याने त्यांना हा वाढीव खर्च झेपेनासा होतो आहे. त्यामुळे आगार प्रमुखांनी त्वरित कर्नाटक डेपोचे बस पास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निपाणीतील विद्यार्थ्यांनी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांना निवेदनाद्वारे केली. आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन लक्ष्मण चिंगळे यांनी दिले.
निवेदनाची प्रत तहसीलदार सुरेश मुंजे यांना पाठवण्यात आली आहे. आदित्य निर्मळे, आदित्य, पाटील, हर्षवर्धन पाटील, सिद्धार्थ परीट, सिद्धार्थ वाडेकर, अनिश वासुदेव, सुरेश कांबळे, प्रतीक कोळी, अलोक फुटाणकर, गुरु चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta