
के. एन. राजण्णा; सत्तेबाबतचा निर्णय हायकमांडवर
बंगळूर : सिध्दरामय्या हे मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यास तसेच आवश्यक असल्यास राजीनामा देण्यासही तयार आहेत, अशी माहिती माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना राजण्णा म्हणाले की, पक्षातील नेतृत्वावरील गोंधळ हायकमांडने लवकरात लवकर सोडवला पाहिजे. हा गोंधळ जितका वाढेल तितके पक्षाचे नुकसान होईल. त्यामुळे हायकमांडने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले की, हायकमांड जो निर्णय घेईल, त्याला सिद्धरामय्या पूर्णतः बांधील आहेत. हा कोणताही घाईघाईत घेतलेला निर्णय नाही. मुख्यमंत्री पदावर कायम राहणे असो किंवा पदत्याग करणे असो-दोन्ही पर्यायांसाठी ते तयार आहेत.
पक्षाच्या भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतही ते खुल्या मनाने चर्चा करत होते. राहूल गांधी यांच्या सूचनांचे पालन करू, असे त्यांनी स्पष्ट केले असून, त्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
राजण्णा म्हणाले, “सत्ता ही कायमची नसते. सत्ता गमावलेले पुन्हा ती मिळवतात. त्यामुळे राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार पुढे जाण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. आम्ही सर्वांनी सिद्धरामय्या यांनीच पुढे राहावे, असा आमचा अभिप्राय हायकमांडसमोर मांडला आहे.”
दलित मुख्यमंत्री व्हावा, या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. अहिंदा (अल्पसंख्याक, हिंदू मागासवर्ग आणि दलित) समाज पूर्णपणे समाधानी नसल्याचेही त्यांनी नमूद केले. २०१३-१८ आणि २०२३-२८ या काळातील सिद्धरामय्या यांच्या कार्यशैलीत फरक असल्याचे त्यांनी सूचित केले.
पुढील विधानसभा निवडणुकीस अजून दोन वर्षे शिल्लक असून, राजकारणात अनेक घडामोडी घडू शकतात. त्यामुळे आत्ताच ठाम अंदाज वर्तवणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांच्या पराभवाबाबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, विजय-पराभव हा राजकारणाचा भाग आहे. एस. एम. कृष्णा यांच्या कार्यकाळातही अनेक मंत्री पराभूत झाले होते. स्वतः कृष्णा यांनीही मतदारसंघ बदलला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीबाबत निश्चित भाकीत करणे योग्य नसल्याचे राजण्णा यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta