
बंगळूर : ट्रॅक्टरला मागून टँकर लॉरीने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना शुक्रवारी विजयनगर आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या सीमेवरील तुंगभद्रा धरणाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर घडली.
मृतांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते सर्व जण कुड्लिगी तालुक्यातील मरळायनहळ्ळी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण कोप्पळ येथील हुलिगेम्मा देवीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरला मागून भरधाव टँकर लॉरीने धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर आणि टँकर पुलावरून खाली कोसळले. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच अनेकांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने होसपेट आणि कोप्पळ येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मृतदेह होसपेट सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच विजयनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक जान्हवी तसेच होसपेटचे डीवायएसपी के. पी. मुरलीधर यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाच्या शवागाराला भेट देऊन पाहणी केली. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात हलविले.
Belgaum Varta Belgaum Varta