
विजापूर : जमिनीच्या जुन्या वादातून सहाजणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडली. भर दिवसा झालेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गोलगी कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला.
या भीषण हल्ल्यात रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस मोठ्या संख्येने गावात दाखल झाले असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
दरम्यान, गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे विजापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta