
श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक; निपाणीत हिंदू एकता सभा
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाव नसून एक प्रचंड विचारशक्ती आहेत. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य आणि कुटुंबाचे सुख पणाला लावले. स्वातंत्र्यानंतरच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा विचार हा काल, आज आणि उद्याही हिंदू समाजाला प्रेरणादायी ठरत राहील, असे मत श्रीराम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, श्रीराम सेना (कर्नाटक), निपाणी तालुका विभागातर्फे येथील गांधी चौकातील वेंकटेश मंदिरात आयोजित ‘हिंदू एकता सभेत ते बोलत होते.
मुतालिक म्हणाले, हिंदू समाज विखुरलेला असल्याने तो कमकुवत बनत चालला आहे. हिंदू समाज एकवटल्यास शत्रू शक्तींचे मनसुबे उधळून लावले जातील. सावरकरांच्या स्वप्नातील अखंड आणि समर्थ हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने आता कंबर कसली पाहिजे. हिंदूंची सुरक्षा ही केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून नसून ती आपल्या एकजुटीवर असल्याचे सांगितले.
संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जत्राट वेस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वर चौकात जगज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर व्यंकटेश मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वन केले. ध्येय मंत्राने सभेची सुरुवात झाली.
हिंदू जन जागृती समितीचे महेंद्र आहिरे यांनी, लव्ह जिहाद आणि गोहत्या यांसारख्या समस्यांनी हिंदू समाजाला ग्रासले आहे. समाज निद्रिस्त राहिल्यामुळे हे संकट वाढत आहे. सावरकरांच्या विचारांतून अखंड हिंदू राष्ट्र उभे करणे, हाच यावरील एकमेव उपाय असल्याचे सांगितले.
सभेस सत्यप्रमोद सरस्वती स्वामी. शिव भंते, अनिता बनगे, नितीन काकडे, रोहन कोठीवाले, सूरज राठोड, गजू कट्टीकर, रामभाऊ मेथे, बबन निर्मळे, अजित पारले, विशाल जाधव, अमोल चेंडके, श्रवण कोळी, शेखर पाटील, आकाश मलाडे, पद्माकर भांबुरे, अभिमन्यू बेलगुडे यांच्यासह हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. राजेश आवटे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव भाट यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta