बेळगाव : मागील महिन्यात रेशन मिळवण्यासाठी दोनदा बायोमेट्रिक करण्याच्या सक्तीमुळे रेशनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. सर्व्हर डाऊन, बोटांचे ठसे न उमटणे आणि वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता जून महिन्यात रेशनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, एकदाच बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वितरित करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केले आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य असली तरी मागील महिन्यात लाभार्थ्यांना दोन वेळा बोटांचे ठसे द्यावे लागत होते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. अनेक ठिकाणी सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती.
या समस्येची गंभीर दखल घेत रेशन वितरक संघटना आणि रास्तभाव दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून दोनदा बायोमेट्रिक करण्याची अट रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून, जून महिन्यापासून एकदाच बायोमेट्रिक करून रेशन वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या निर्णयामुळे हजारो रेशनधारकांचा वेळ, श्रम आणि त्रास वाचणार असून वितरण व्यवस्थेतही अधिक पारदर्शकता आणि सुलभता येणार आहे. मागील महिन्यात उद्भवलेल्या समस्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विभागाने योग्य ती पावले उचलल्याने लाभार्थी आणि रेशन दुकानदारांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. “एक देश, एक रेशन” योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta