खानापूर : शाळा व महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपुऱ्या बसवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बस सेवा सुरळीत करावी यासाठी परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले असून बस सेवा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे आला आहे.
खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर वेळेवर बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण जात आहे. तसेच सायंकाळी घरी परतताना देखील त्यांना दीर्घकाळ बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक मार्गांवर बसांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना गर्दीच्या बसमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी बसच्या दरवाजावरील लोखंडी ग्रीलला लोंबकळत प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची अवस्था दयनीय असून पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. खराब रस्ते आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक यामुळे अपघाताचा धोका वाढला असून कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात खानापूर-बेळगाव मार्गावरील बस संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गणेबैल, इदलहोंड आणि निदुर या गावांमध्ये खानापूर आगाराच्या सर्व बसांना थांबा देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय खानापूर-लोंढा, खानापूर-बिडी, खानापूर-जांबोटी, खानापूर-गर्लगुंजी, खानापूर-हेमाडगा आणि खानापूर-कणकुंबी, खानापूर हलशी या महत्त्वाच्या मार्गांवरील बस सेवेच्या समस्या तातडीने दूर करण्याची आवश्यक आहे परिवहन विभागाने या मागण्यांची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शंकर गावडे, बाळकृष्ण पाटील, श्री पाटील, मुकेश गुरव, श्रावण गोडसे, भारत पाटील, शंकर गावडे, शुभम कांबळे, साईनाथ मलिक, आदित्य कांबळे, राम चिक्कलकर, श्रेयर हलियाळकर, एकनाथ गावडे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta