

बेंगळुरू : राज्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ‘प्रजा सेवा’ या नावाने स्वतंत्र खाते स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या खात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.
या नव्या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री महिन्यातून दोन दिवस थेट नागरिकांच्या भेटीला जाणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व निवेदने स्वीकारून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी ‘प्रजा सेवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. संबंधित दिवशी शासकीय सुट्टी असल्यास पर्यायी दिवस निश्चित केला जाईल.
नव्या नियमांनुसार पालकमंत्र्यांनी जिल्हा दौऱ्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदारांसोबत संयुक्त बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, तसेच जिल्हानिहाय प्रमुख प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत. मंत्र्यांच्या जिल्हा भेटीचे वेळापत्रक नागरिकांना आगाऊ जाहीर केले जाणार असल्याने अधिकाधिक नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे.
या निर्णयामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत, तर त्यांच्या तक्रारी एका छताखाली ऐकून त्यांचे जलद निराकरण करण्याची यंत्रणा उभी राहणार आहे.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, ‘प्रजा सेवा’ हे खाते नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येत असून, राज्यातील काही महत्त्वाच्या तालुक्यांचा वैयक्तिक दौरा करून तेथील समस्या जाणून घेण्याचाही आपला मानस आहे.

Belgaum Varta Belgaum Varta