

यल्लापूर : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात अरबैळ घाटातील बळगार परिसरात गुरुवारी (९ जुलै) पहाटे भीषण रस्ता अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर (तुफान क्रूझर) आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये बसवराज (४८), अभिषेक ईश्वर (२८), अक्षय (२६), अभिषेक (२६) आणि संजय अंगडी यांचा समावेश आहे. यापैकी पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका जखमीचा रुग्णालयात नेत असताना मार्गात मृत्यू झाला.
अपघातात शिवराज दुर्गप्पा मडिवाळ (२२), मंजुनाथ अशोक चुलकी (३२), सचिन आणि चेन्नबसय्या बसलिंगय्या संपगाव (२८) हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त क्रूझरमधील सर्वजण मूळचे धारवाड येथील असून ते बेंगळुरूतील एका प्रसिद्ध अन्न वितरण कंपनीत पार्ट-टाईम डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. बुधवारी (८ जुलै) रात्री ते धर्मस्थळ आणि चिक्कमंगळूर येथे सहलीसाठी निघाले होते. मात्र, पहाटे अरबैळ घाटात त्यांच्या वाहनाची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली आणि या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच यल्लापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. सहलीसाठी गेलेले तरुण मृतावस्थेत परतल्याची बातमी समजताच धारवाडमधील त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Belgaum Varta Belgaum Varta