

विजयपूर (प्रतिनिधी) : विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर शुक्रवारी झालेल्या भीषण कार अपघातात एका कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांची ओळख सत्यवेणी (३८), त्यांचा मुलगा हरिवेंकटराम (२०) आणि जश्वंत (१८) अशी झाली आहे. तर राघवेंद्र (४१) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे कुटुंब कारटगी येथून शिर्डीकडे दर्शनासाठी निघाले होते. केए-३३ एन-४६८९ क्रमांकाची क्रेटा कार हरिवेंकटराम चालवत होते. मनगुळीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजकाला भरधाव वेगात आदळली. या भीषण धडकेत कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच मनगुळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta