Sunday , July 26 2026
Breaking News

विद्यार्थ्याअभावी 274 सरकारी शाळांना टाळे!

Spread the love

 

इंग्रजी माध्यम व खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल; खानापूर तालुक्यातील तीन शाळाही बंद

बेळगाव : खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता ओढा, ग्रामीण भागातील स्थलांतर आणि सरकारी शाळांमधील सातत्याने घटणारी विद्यार्थीसंख्या यामुळे राज्यातील 274 सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या यादीत खानापूर तालुक्यातील तीन शाळांचाही समावेश असून, सरकारी शिक्षण व्यवस्थेसमोरील वाढते संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.

शिक्षण विभागाने नव्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई केली. अनेक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या अत्यल्प झाल्याने त्या चालविणे आर्थिकदृष्ट्या व प्रशासकीयदृष्ट्या अशक्य ठरत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

गत 2025-26 शैक्षणिक वर्षातही राज्यातील 676 शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेनंतर तर 104 शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याशिवाय, इयत्ता पहिलीतील प्रवेशसंख्येतही मोठी घट झाल्याची नोंद शिक्षण विभागाने केली आहे.

सध्या राज्यात 74,859 शाळांमध्ये सुमारे 1.17 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, केवळ एकच विद्यार्थी असलेल्या 7,349 शाळा राज्यात अस्तित्वात आहेत. त्यामुळे सरकारी शाळांचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे राहिले असून, विद्यार्थीसंख्या वाढली नाही तर आगामी काळात आणखी शाळांवर टाळे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

परवानगीशिवाय खासगी कार्यक्रमांना हजेरी महागात; सरकारी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाचा इशारा

Spread the love  बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांतील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *