


भरती परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक; जिल्हाधिकाऱ्यांना समन्वयाच्या सक्त सूचना
बेंगळूरू : राज्यातील भरती परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. विविध विभागांतील सुमारे ७० हजार पदांच्या भरतीसाठी व्यापक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला असून परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
अलीकडच्या काळात भरती परीक्षांमध्ये गैरव्यवहारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेंद्र कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर कडक सुरक्षा व्यवस्था, प्रभावी समन्वय आणि गैरप्रकारांना शून्य सहनशीलतेचे धोरण राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत कोणत्याही प्रकारच्या गोंधळाला वा गैरव्यवहाराला वाव न देता भरती परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने घेण्यावर भर देण्यात आला. यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्परांमध्ये प्रभावी समन्वय ठेवावा, परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था उभारावी तसेच संशयास्पद हालचालींवर तातडीने कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे आगामी भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta